शिक्षक पण शिकविण्यास पात्र असावे म्हणून राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा घेणे सूरू केले आहे. विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक वृंद पण ‘तावून सुलाखून’ निघणार असतील तर उत्तम.
हा त्यामागचा हेतू शासनाने ठेवला.
पण बघतो तर काय, चक्क नापास झालेले अधिक निघाले, असा निकाल पुढे आला आहे. शिक्षकांची पात्रता ठरविणाऱ्या महा टीईटी २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. हा निकाल शिक्षण क्षेत्रास चांगलाच धक्का देणारा ठरत असल्याची शैक्षणिक वर्तुळ प्रतिक्रिया देत आहे.
राज्यात मोठ्या संख्येने शिक्षक पात्र होण्यास इच्छुक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. केवळ ११ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहे. म्हणजे ३ लाख ९६ हजार पेक्षा अधिक उमेदवार विद्यार्थी नापास झाल्याची ही आकडेवारी आहे. आता जर गुरुजी हेच या मोठ्या प्रमाणात नापास होत आहे, तर गुणवत्ता कशी सिद्ध करणार, असा प्रश्न उपस्थित केल्या जाऊ लागला आहे. उद्याची पिढी घडविणाऱ्या शिक्षकांची पात्रता ठरविणाऱ्या महा – टीईटी परीक्षेत हे आता दिसून आले आहे. गुरुजी वर्ग जर असे लाखात नापास असतील, तर मुलं घडणार कसे, असा प्रश्न.
राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेली माहिती अशी. एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी या महा टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देण्यास उपस्थित झाले होते. म्हणजे २८ हजार ९३८ विद्यार्थी हे गैरहजर राहले, अशी आकडेवारी आहे. अंतिम निकाल लागला. त्यात फक्त ५० हजार ३६९ उमेदवार विद्यार्थी पात्र ठरले. आणि उर्वरित ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार नापास म्हणजे अनु्तीर्ण झाले आहेत. पेपर १ व पेपर २ या दोन्ही पातळी वर नापास होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हीच बाब चिंतेची समजल्या जात आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असलेल्या पेपर एक मध्ये २ लाखा पेक्षा अधिक उमेदवार यांनी नोंदणी केली होती. जाहीर करण्यात आलेल्या निकालात माध्यम निहाय आणि विषय निहाय यात मोठे अंतर असल्याचे निरीक्षण आहे. कन्नड माध्यमाचा निकाल अती उत्तम तुलनेने चांगला लागला आहे. या विषयात १५ टक्के वर निकाल असल्याची नोंद झाली आहे.
मराठी, हिंदी व तेलगू माध्यमाचा निकाल जेमतेम सरासरी आसपास आहे. तर उर्दू, इंग्रजी व प्रामुख्याने गुजराती माध्यमातील निकालाची टक्के वारी अत्यंत कमी असल्याचे निकाल सांगतो. गणित, विज्ञान व सामाजिक विज्ञान या विषयात अपेक्षा होती त्यापेक्षा कमी निकाल लागला आहे. उपस्थित उमेदवारपैकी केवळ ११. ४७ टक्केच उमेदवार उत्तीर्ण झाले. पेपर दोन मध्ये म्हणजे इयत्ता सहावी ते आठवी साठी घेण्यात आलेल्या परीक्षेत तर वेगळी स्थिती दिसून आली नाही. या परीक्षेत पण निकाल ११. १२ टक्के असा मर्यादित राहिल्याची नोंद पुढे आली आहे.
