संघाने सांगितले तर निवृत्त..! 75 वर्षे पूर्ण, मोहनजी भागवत थेट बोलले; भाजपमुळे चांगले दिवस नाहीत तर…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली की कोणत्याही पदावरून पायउतार होण्याची परंपरा असल्याचे मानले जाते. ही परंपरा भाजपशीही जोडली जाते. त्यामुळेच सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत मागीलवर्षी जोरदार चर्चा होती.

दोघांनीही वयाची पंचाहत्तरी पार केली आहे. याबाबत आज भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मोहनजी भागवत यांनी विविध मुद्द्यांवर बोलतांना संघाच्या १०० वर्षांच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. नव्या सरसंघचालकांबाबत बोलताना ते म्हणाले, संघाचे नेतृत्व करणारी व्यक्ती नेहमीच हिंदू असेल, मग ती कोणत्याही जातीची असो. सरसंघचालक बनण्यासाठी क्षत्रिय, वैश्य, शुद्र किंवा ब्राम्हण ही पात्रता नाही. तर जो हिंदू असेल, तोच सरसंघचालक बनेल.

वयाची पंचाहत्तरी ओलांडली असल्याचे सांगत ते म्हणाले, संघाने आपल्याला काम सुरूच ठेवण्यास सांगितले आहे. पण जर संघाने पद सोडण्यास सांगितले तर आपण लगेच पद सोडायला तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरसंघचालक पदासाठी कोणतीही निवडणूक होत नाही. क्षेत्रीय आणि विभागीय प्रमुख ही नियुक्ती करतात. वयाच्या ७५ नंतर कोणत्याही पदाशिवाय काम करायला हवे, असे संकेत आहेत. संघाने सांगितले तर मी पद सोडेन पण कामातून निवृत्त होणार नाही, असेही मोहनजी भागवत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलताना भागवत म्हणाले, अनेक लोक म्हणतात की, नरेंद्र भाई हे आरएसएसचे पंतप्रधान आहेत. पण त्यांची पॉलिटिकल पार्टी आहे, ती भाजप आहे. ती वेगळी आहे. पण त्यात खूप स्वयंसेवक आहेत, ते प्रभावीही आहेत, असे सांगत भागवत यांनी आरएसएस आणि भाजप पूर्णपणे वेगळे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान भागवत यांना भाजप सत्तेत आल्यामुळे आरएसएसला चांगले दिवस आले आहेत, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना भागवत म्हणाले, भाजपा सत्तेत आल्याने संघाचे चांगेल दिवस आले का, तर हे याउलट आहे. आमच्या कष्टामुळे आमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. आम्ही राम जन्मभूमीचे आंदोलन सुरू केले. ते लोकांना पटेल, लोकं जोडत गेली. लोक आमचं ऐकत असतील तर त्याचा त्यांना फायदो होतो. त्यांनी (भाजप) आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले, असे भागवत म्हणाले. संघाच्या शाखेत राजकारण होत नाही, आम्ही भाजपवर दबाव टाकत नाही, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply