उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,संजय राऊत…हाजीर हो!

नवी दिल्ली: शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत भर पडली आहे. शिवसेना पक्षचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात कोर्टाने तिघांना समन्स बजावले असून, तिघांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

असे आहे प्रकरण?

शिवसेनेचे मुंबई येथील खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असुन, त्यात असं म्हटलं होतं की, ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. या विरूद्ध मानहानीचा दावा करण्यात आला आहे. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने दाखल करून घेत तिघांना प्रत्यक्ष कोर्टात आवश्यक ती कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश समन्स जारी करून दिले आहेत.

 

 

 

 

 

 

 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदार, १३ खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या तिघांनी आमदार-खासदारांवर आक्रमक टीका करत आहेत. अनेक ठिकाणी खोके उल्लेख करून डिवचण्यात येते. आजही सोशल मीडियावर शिंदे गटातील आमदार,खासदारांवर केलेली विधाने आहेत. त्यामुळे दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधातही नोटीस काढली आहे. या पोस्ट का हटवण्यात आल्या नाहीत असा खुलासा कोर्टाने मागितला आहे.

 

प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीत मानहानीच्या दाव्याची याचिका दाखल करण्यात आली. राहुल शेवाळे यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात ठाकरेंकडून केलेले बदनामीकारक विधाने सादर केली. या विधानाचे गांभीर्य ओळखून कोर्टाने ही याचिका स्वीकारली. न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मनाई आदेश का काढू नयेत, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमचे जे काही म्हणणे असेल ते लेखी दाखल करा, असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे.

Leave a Reply