पुण्यातील भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते.
याप्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून पिडीत तरुणीने बारामती कोर्टाकडे घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरूणीने दिलेल्या या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आज बारामती कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाकडे तरूणीने ही इच्छा व्यक्त केली.
पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचे अपहरण केल्याचा दावा केला जात होता, विशेष म्हणजे या मुलीचं लग्न दोन दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. लग्नाची खरेदी करुन ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत घरी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं, यावेळी तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड देखील टाकण्यात आली असा दावा करण्यात येत होता. मात्र त्यानंतर या प्रकरणात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये बोलताना या मुलीनं मोठा दावा केला होता. मी सबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून आले, आमचे प्रेमसंबंध आहेत, असं या मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते.
दरम्यान युवतीच्या अपहरणाच्या घटनेनंतर भिगवणमध्ये संतप्त प्रक्रिया उमटल्या होत्या. हिंदूत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींनी अटक करण्याची मागणी केली. ज्यावेळी तरुणीला बारामती कोर्टात जबाब नोंदवण्यासाठी आळी त्यावेळी मुलीची आई देखील न्यायालयच्या आवारात उपस्थित होती. माझ्या मुलीला माझ्या ताब्यात द्या… मला माझं लेकरू द्या! अशी मागणी करत होती. मात्र आईला पाहून देखील मुलीच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हता तसेच डोळ्यांत अश्रू देखील नव्हते. आईकडे न पाहता मुलगी थेट पोलिसांच्या गाडीकडे धावत गेली.
मुलगी काय म्हणाली कोर्टात?
मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीला सुधार गृहात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज बारामती कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
नेमकं काय घडलं?
भिगवण येथे 21 वर्षीय तरुणीचे तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. भिगवण बंदची हाक देण्यात आली आणि त्याला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्याची तयारी सुरू होती.