तयारीला लागा ! महाराष्ट्रासह 22 राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये होणार एसआयआर, राज्यांना निवडणूक आयोगाचे पत्र

पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये मतदार याद्यांची ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिज’ (एसआयआर) केल्यानंतर आता निवडणूक आयोगाने 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे मोर्चा वळवला आहे.

महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशा आदी राज्यांमध्ये एसआयआर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात लवकरात लवकर पूर्वतयारी करण्याचे आदेश या राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया एप्रिल महिन्यापासून सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

निवडणूक आयोगाने 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना एसआयआरच्या पूर्वतयारीबाबत पत्र पाठवले आहे. गेल्या वर्षी 24 जून रोजी निवडणूक आयोगाने देशभरात एसआयआर करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. बिहारमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर गेल्या वर्षाच्या अखेरीस पश्चिम बंगाल, मध्य पदेश, राजस्थान, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, छत्तीसगड, गोवा आदी 12 राज्यांमध्ये दुसरा टप्पा पार पडला. आता तिसऱ्या टप्प्यात देशातील उर्वरित राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगानुसार, 21 वर्षांपूर्वी एसआयआर प्रक्रिया राबवण्यात आली होती.

या राज्यांमध्ये पार पडणार एसआयआर प्रक्रिया

महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, हरयाणा, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, लडाख, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, चंदीगड, दादरा व नगर हवेली, दमण आणि दिव या राज्यांमध्ये आता एसआयआरचा पुढचा टप्पा होणार आहे.

अशी होणार प्रक्रिया

एसआयआर जाहीर करण्यात आलेल्या राज्यांमध्ये सर्वप्रथम मतदार याद्या गोठवण्यात येतील. प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांसाठी ‘ईआरओ’- नियुक्त करण्यात येतील. ते प्रत्येक मतदारासाठी अर्ज छापून घेतली. त्यानंतर बूथ अधिकारी प्रत्येक घरी तीन वेळा जाऊन हे अर्ज गोळा करतील. त्यानंतर प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. त्यासंदर्भातील दाव्यांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

Leave a Reply