‘अध्यात्मिक संगतीमुळे आदर्श जीवनाची पायाभरणी होते’

श्रीमद् भागवतकथा श्रवणात भाविक मंत्रमुग्ध

माजलगाव: वारकरी संप्रदाय हा समन्वयाची भुमिका घेऊन भेदरहित समाजरचना अंगिकृत करणारे तत्त्वज्ञान देतो. “गीता -भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे” असे संतप्रमाण आहे. त्या अनुषंगाने विचार करता संतसंग जीवनाचे परिवर्तन घडवून आणणारा असतो. यासाठी अध्यात्मिक बैठक गरजेची असुन अध्यात्मिक संगती आदर्श जीवनाची पायाभरणी करणारी असल्याचे प्रतिपादन भागवत मर्मज्ञ बाळु महाराज उखळीकर यांनी केले.

 

श्री. विठ्ठल भगवान काॅम्प्लेक्स गृृहसंस्कार कार्यानिमित्त शेजुळ व गुळभिले परिवाराच्या वतीने दि. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या सप्ताहात दररोज  दुपारी २ ते ५ या वेळेत श्री. विठ्ठल भगवान काॅम्प्लेक्स बीड रोड माजलगाव येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.सुप्रसिद्ध भागवतकथा प्रवक्ते ह.भ.प. भागवत मर्मज्ञ बाळु महाराज जोशी उखळीकर यांच्या अमृत वाणीतून भागवत कथा निरुपण होत आहे. या कथेच्या पंचम  दिवसाच्या कथा प्रसंगी भागवतमर्मज्ञ बाळु महाराज उखळीकर यांनी विविध कथा प्रसंग व तत्त्वचिंतन मांडले. विविध कथा आणि प्रसंग या माध्यमातून अध्यात्मिक तत्त्वांचे चिंतन अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी मांडले. भागवतकथा श्रवणात भाविक मंत्रमुग्ध होउन जात आहेत. कथेदरम्यान सादर होणारी श्रवणीय भजने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकत आहेत.

या कथेला हार्मोनियम ह भ प सर्जेराव महाराज सपकाळ, गायक ह भ प मनोज महाराज शिंदे, तबला ह भ प संतोष महाराज कदम, बुलबुल सात ह भ प आकाश राव आदी संगीत साथ करत आहेत. दिनांक 14 डिसेंबर रोजी कथेची सांगता होणार असून या निमित्त सकाळी 11 ह भ प बाळू महाराज जोशी उखळीकर यांचे कीर्तन होणार आहे. या कथा – कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भगवानराव शेजुळ, अनंत शेजुळ, अविनाश शेजुळ, कल्याणराव गुळवे , बालासाहेब गुळगिले आदींनी केले आहे.

Leave a Reply