पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई: महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच या कार्याने प्रभावित होवून इतर समाज सेविका व संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून राज्य शासनाकडून महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असणाऱ्या समाजसेविका व संस्थाना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. मुंबई उपनगर जिल्ह्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 ( राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय) प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

 

जिल्हास्तरीय पुरस्कार :- जिल्ह्यात महिला व बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत समाज सेविका असाव्यात, महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष काम केलेले असावे, जिल्ह्यातील एकाच महिलेस हा पुरस्कार देण्यात येईल, कोणत्याही महिलेस एकापेक्षा अधिक वेळा जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म व पंथ या गोष्टीचा विचार केला जाणार नाही, पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तीच्या मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दलित मित्र पुरस्कार, अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला हे पुरस्कार मिळालेले आहे, त्या या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. पुरस्काराचे स्वरूप दहा हजार एक रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.

 

विभागीय स्तरावरील पुरस्कारासाठी पुढीलप्रमाणे निकष आहेत. विभागीयस्तरीय पुरस्कार हा महिला व बालकल्याण क्षेत्रात महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण, पुनर्वसन, अंधश्रद्धा निमूर्लन, जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल, महिला व बाल कल्याण क्षेत्रात कमीत कमी 7 वर्षापेक्षा जास्त काम केले असावे. स्वयंसेवी संस्था धर्मादाय कायदा अंतर्गत नोंदणीकृत असावी. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. पुरस्काराचे स्वरूप – 25 हजार एक रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.

 

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुढीलप्रमाणे निकष आहेत, महिला व बालकल्याण क्षेत्रात मौलिक कामगिरी करणारी नामवंत समाजसेविका असावी, महिला व बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 25 वर्षे काम केलेले असावे, कोणत्याही महिलेस एकापेक्षा अधिक वेळा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म व पंथ या गोष्टीचा विचार केला जाणार नाही, पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तीच्या मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल, ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला हे पुरस्कार मिळालेल्या वर्षानंतर 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीयय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय, प्रशासकीय इमारत टप्पा -2, पहिला मजला आर. सी. मार्ग, चेंबूर मुंबई 400071, दुरध्वनी क्रमांक 022-25232308 येथे संपर्क साधवा, असे आवाहन बी.एच.नागरगोजे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Leave a Reply